एकीकडे विधानसभेचे चुरस सुरु असतानाच साताऱ्यामध्ये लोकसभेच्या पोट निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला जोरदार झटका दिला आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला आहे. ९५ हजारहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विजयी झाले आहेत. याबरोबर राज्यातही राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड ७५ हजारहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचा त्यांनी पराभव केला आहे. याच पार्श्वभूमीवर पहिली प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी स्वत:च्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा आनंद अधिक असल्याचे म्हटले आहे.
“लोकांनी उदयनराजेंना जो धडा शिकवला आहे तो महत्वाचा आहे. मला माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचाच अधिक आनंद झाला आहे. उदयनराजेंनी शरद पवारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. त्यानंतर त्यांना लोकांनी धडा शिकवला आहे,” असं मत आव्हाडांनी विजयानंतर व्यक्त केलं आहे. तसेच “दहा वर्षांपूर्वी शरद पवारांनी संपूर्ण जिल्ह्याचा विरोध पत्कारुन उदयनराजेंना उमेदवारी दिली होती. आम्ही महाराजांच्या विचारांवर चालतो, महाराजांनी आम्हाला कधी गद्दारी शिकवली नव्हती,” असं मतही आव्हाडांनी व्यक्त केलं आहे.
साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या खासदारकीचा राजीनामा देत विधानसभा निवडणुकीआधीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर उदयनराजे यांनी शरद पवार यांनी दूर्लक्ष केल्याने पक्षाला गळती लागल्याचा आरोप केला होता.
पाटील यांच्या विजयावर पवार म्हणतात..
श्रीनिवास पाटील यांच्या विजयाबद्दल शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आनंद व्यक्त केला. “साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न राखणाऱ्यांचा पराभव झाला आहे. कोणी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याचं समर्थन केलं नाही हे लोकांनी दाखवून दिलं आहे. सत्ता जाते, सत्ता येते मात्र पाय जमिनीवरच ठेवावे लागतात. सत्तेचा उन्माद जनतेला आवडत नाही हे या निकालातून स्पष्ट झालं आहे. श्रीनिवास पाटील हे एकेकाळचे संसदेचे सदस्य होते. एका राज्याचं राज्यपाल पद त्यांनी सांभाळलं म्हणूनच आम्ही त्यांना उमेदवारी दिली. सातारच्या जनतेने चांगल्या मतांनी त्यांना निवडून दिलं त्याबद्दल सातारकरांचा आभारी आहे,” असं मत पवारांनी नोंदवलं. तसेच आपण साताऱ्याला जाऊन आपण जनतेचे आभार मानणार आहोत असंही त्यांनी सांगितलं.