जम्मू-काश्मीरचा शेवटचा राजा हरी सिंह यांचे वंशज आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्ण सिंह यांनीही जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा नसून त्यावर टीका करणं योग्य नाही, असं कर्ण सिंह यांनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरचे दोन राज्य करण्याच्या निर्णयालाही कर्ण सिंह यांनी पाठिंबा दिला आहे. दोन केंद्रशासित प्रदेश करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर पूर्णपणे टीका करणं योग्य नाही. त्यात अनेक सकारात्मक गोष्टींचाही अंतर्भाव आहे. मात्र संसदेनं अत्यंत घाईघाईने हा निर्णय घेतल्याने आम्हा सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला, असंही त्यांनी म्हटंल आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला लडाख आणि जम्मूसहित संपूर्ण देशातून पाठिंबा मिळतोय. या परिस्थितीचा मी खूप विचार केलाय. या घटनाक्रमावर पूर्णपणे टीका करावी असं मला वाटत नाही. त्यात अनेक चांगल्या गोष्टींचाही अंतर्भाव आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय योग्य आणि स्वागताहार्य आहे. सदर-ए-रियासत असताना १९६५मध्ये मीच ही सूचना केली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच अटक करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीरमधील सर्व नेत्यांची सुटका करण्याची मागणीही त्यांनी केली.
WhatsApp us