अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीनंतर जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा, शमीनं केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजवर ३१८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतानं विंडीजचा दुसऱ्या डावात अवघ्या १०० धावांत खुर्दा केला. भारताचा विदेशी दौऱ्यातील हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी भारतानं २०१७मध्ये श्रीलंकेला ३०७ धावांनी नमवले होते.
भारतानं विंडीजसमोर विजयासाठी ४१९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजच्या फलंदाजांनी नांगी टाकली. अवघ्या ५० धावांवर ९ गडी बाद झाले. कीमर रोच आणि मॅगुअल कमिंस यांनी दहाव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी रचली. अखेर संघाच्या १०० धावा असताना इशांत शर्मानं रोचला बाद केलं.
