राज्यभर गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये ९ जण बुडाले असून नगरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. अमरावतीत विसर्जनासाठी पाण्यात गेलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवताना इतर तीन तरुण बुडाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे अमरावतीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्येही विसर्जनावेळी तीन आणि सिंधुदुर्गात दोन तरुण बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे. तर नगरमध्ये प्रवरा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे.
अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील वाठोडा शुकलेश्वर येथे आज दुपारी ही घटना घडली. पूर्णा नदीपात्रात गणेश विसर्जन करताना एक तरुण बुडू लागला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी तीन तरुणांनी नदीत उड्या मारल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने या तीन तरुणही बुडाले. सतीश जाबराव सोळंके, ऋषीकेश बाबुराव वानखेडे, सतीश बारीकराव वानखेडे आणि सागर अरुण शेंदूरकर अशी नदीत बुडालेल्या चौघांची नावं असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. हे चौघेही गौरखेडा येथील रहिवासी आहेत. नदीच्या प्रवाहातील पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही बुडाल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, रात्र झाल्याने अग्निशमन दलाने शोधकार्य थांबवलं आहे. उद्या सकाळी पुन्हा या चारही तरुणांचा शोध घेण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथेही गणपती विसर्जन करताना तीनजण बुडाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. कुलदीप वारंग, रोहीत भोसले आणि सिद्धेश तरवणकर अशी या तरुणांची नावं असून यापैकी कुलदीप आणि रोहीत हे दोघेही मुंबईचे राहणारे आहेत. आज दुपारी ही घटना घडली.
सिंधुदुर्गातही विसर्जनावेळी दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. गणपती विसर्जनाच्यावेळी आचरा समुद्र किनारी गणपती विसर्जनासाठी गेलेले आचरा वरची वाडी येथील दोन युवक बुडल्याची दुर्घटना आज सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. लाईफटाईम हॉस्पिटलचे कर्मचारी प्रशांत तावडे (२७) आणि एसटी महामंडळाचे ड्रायव्हर संजय परब (४७) हे घरच्या गणपतींचं विसर्जन करण्यासाठी समुद्रात घेऊन गेले होते. गणपती पाण्यात सोडून परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडू लागले. यावेळी जीवरक्षक रसिक जोशी यांनी जिवाची बाजी लावून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याने प्रयत्न फोल ठरले.
