अयोध्या प्रकरणाची दररोज सुनावणी करण्याची मुस्लिम पक्षकारांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शुक्रवारपर्यंत पाचही दिवस अयोध्या प्रकरणाची सुनावणी करण्यात येणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणावर आठवड्यातून पाच दिवस दररोज सुनावणी होणार आहे.
अयोध्या प्रकरणावर दररोज सुनावणी करण्यास मुस्लिम पक्षकारांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. या प्रकरणावर बाजू मांडण्यासाठी तयारी करण्यास वेळ मिळाला नसल्याचं मुस्लिम पक्षकारांनी कोर्टाला सांगितलं. मात्र कोर्टाने त्यांचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायामूर्ती एस. ए. बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दूल नजीर यांच्या पाच सदस्यांच्या घटनापीठा समोर अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
आठवड्यातून पाच दिवस सुनावणी करणं हे अमानवीय आहे. एवढ्या घाईनं सुनावणी करणं योग्य नाही. असं असेल तर मला नाईलाजाने हा खटला सोडावा लागेल, असं मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी सांगितलं. त्यावर तुमचं म्हणणं ऐकून घेण्यात आलंय, त्याबाबत नंतर चर्चा करू, असं कोर्टानं स्पष्ट केलं.
