राहत्या घरात गावठी बॉम्ब तयार करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना मंगळवारी रात्री हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगी येथून अटक करण्यात आली. कोल्हापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून ६९ गावटी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळं खळबळ उडाली आहे.
विलास राजाराम जाधव (वय ५२ ) व आनंदा राजाराम जाधव (५४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं असून हे दोघे भाऊ आहेत. त्यांनी डुक्कराची शिकार करण्यासाठी बॉम्ब बनविल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयितांचे उजळाईवाडी स्फोटाशी कनेक्शन असण्याची शक्यता आहे.
उजळाईवाडी येथील उड्डाण पुलाखाली १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या स्फोटात ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील (न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) हे ठार झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, बॉम्ब शोधक, नाशक पथक, विशेष तपास पथक (एसआयटी) आणि स्थानिक पोलिसांची पथके तैनात केली होती. विधानसभा निवडणुकीत स्फोट झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. उड्डाण पुलाखाली झालेल्या स्फोटाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष माने, हरिश पाटील यांना माले मुडशिंगी येथे दोघे भाऊ गावठी बॉम्ब बनवून त्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना दिली. त्यांनी या ठिकाणी सापळा रचून छापा टाकण्याचे आदेश दिले. या दोन संशयितांच्या घरावर छापा टाकला असता बॉम्ब बनविण्याच्या साहित्यासह पांढऱ्या व गडद तपकिरी रंगाचे एकूण ६९ गावठी तयार बॉम्ब, असा सुमारे ७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
दरम्यान, पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दोघा संशयितांकडे कसून चौकशी केली. सल्फर, पोटॅशियम पावडर, गारगोटीचे खडे आदी साहित्य वापरुन गावठी बॉम्ब बनवित असल्याची कबुली त्यांनी दिली. बॉम्बला रक्ताच्या आवरणाचा वापर करुन रानडुकरांची शिकार करण्यासाठी त्याचा वापर करीत असल्याचे सांगितले. संशयित भुईबावडा, धुंदवडे (ता. राधानगरी) येथील शेतामध्ये डुकरे मारण्यासाठी या बॉम्बचा वापर करीत होते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही बॉम्बची विक्री करीत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. उजळाईवाडी येथील स्फोटाचे साहित्य आणि संशयितांकडे मिळून आलेले साहित्य एकाच प्रकारचे आहे. दरम्यान, त्यांनी स्फोटके ठेवली होती की या प्रकरणी यापूर्वी ताब्यात घेतलेल्या तिघा संशयितांनी उड्डाणपुलाखाली साहित्य ठेवले होते, याची चौकशी सुरु केली आहे.
