राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी होणाऱ्या मतदानाकरिता निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. राज्यात शांततेत मतदान पार पडावे म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, गुजरात राज्य राखीव दलाचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुर्गम भागासाठी वायरलेस सेट तसेच संवेदनशील केंद्राच्या टेहाळणीसाठी ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. या शिवाय गुगल मॅपमध्ये सर्व मतदान केंद्रे टॅग केल्याने मतदान केंद्र नेमके कुठे आहे, किती जवळ किंवा लांब आहे हे मतदारांना घर बसल्या समजणार आहे.
राज्यातील २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३५० तुकड्यांसह सुमारे तीन लाख पोलिसांचा बंदोबस्त राज्यभरात तैनात करण्यात आला आहे. त्याशिवाय छत्तीसगड, गुजरात, मध्यप्रदेश आणि तेलंगणामधून होमगार्ड्स मागवण्यात आले आहेत. आतापर्यंत ३३ उमेदवारांसह १७७९ जणांविरोधात आचारंसहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्याप्रमाणेच मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघासह राज्यभर उद्या (दि. २१ ऑक्टोबर) विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात २५ लाख ९ हजार ५१८ इतके मतदार आहेत. सुलभ मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात २५९२ मतदान केंद्रे आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.
मतदानाच्या तयारी संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जोंधळे बोलत होते. मतदान प्रक्रियेसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, या निवडणुकीसाठी २१ हजार अधिकारी/कर्मचारी कार्यरत आहेत. तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दला व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जोंधळे यांनी दिली.
