सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीत मदतीसाठी महाबळेश्वर व तापोळा येथील १४ बोटी गुरूवारी सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने रवाना करण्यात आल्या आहेत. या बोटी रात्रीच सांगली व कोल्हापूर येथे पोहचणार आहेत.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात भयानक पूर परिस्थिती असल्याने पुराच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी व तेथील प्रशासनाच्या मदतीसाठी आज तापोळा येथील शिवसागर जलाशयातील तसेच महाबळेश्वर येथील वेण्णालेक येथील बोटी रवाना करण्यात आल्या आहेत . वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर – चौगुले महाबळेश्वरच्या तहसीलदार मीनल कळसकर, महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिकांच्या मदतीने बोटी ट्रक मध्ये भरण्यात आल्या, विशेष म्हणजे या कामात या अधिकाऱ्यांनी देखील मदत केली. पावसामुळे बोटी ट्रकमध्ये चढवण्यास थोडा अडसर येत होता. यापूर्वीही महाबळेश्वर, वाई, येथून पाच बोटी कराड व पाटण येथील पूर परिस्थितीत आपत्कालीन व्यवस्थेला बदलीसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. या बोटींसह कर्मचारीही रवाना करण्यात आले आहेत.
