सांगली आणि कोल्हापूरमधील पुरस्थिती अतिशय गंभीर असून पंजाब, गोवा, गुजरातमधून मागवण्यात आलेल्या अतिरिक्त पथकांच्या माध्यमातून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दलाच्या मदतीने पूरग्रस्तांना एअरलिफ्टने बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन करतानाच कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात राष्ट्रीय आपत्तीच्या धर्तीवरच युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात येत असून योग्यवेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. कोल्हापुरात १८ गावांना पुराचा वेढा पडला असून या पुरामुळे २८ हजार लोक बाधित झाले आहेत. या पुरामुळे कोल्हापुरात चौघांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे ६७ हजार हेक्टर जमिनीवरील पीकं नष्ट झाली असून ऊसालाही धोका निर्माण झाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूरमधील पूरस्थितीची पाहणी केली. तसेच अधिकारी आणि पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केलं. कोल्हापूर आणि सांगलीत पूरस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या मदतीसाठी पंजाब, गोवा आणि गुजरातमधून एनडीआरएफची अधिक कुमक मागवण्यात आली आहे. सांगलीत परिस्थिती अत्यंत गंभीर असून खराब हवामानामुळे सांगली दौरा रद्द करावा लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
