दिल्लीतील भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर रविवारी भाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आज, सोमवारी वा उशिरात उशिरा मंगळवारी युतीची घोषणा होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. विशेष म्हणजे, शिवसेनेला १२० जागाच देण्यावर अडून बसलेल्या भाजपने ऐनवेळी ‘मित्रपक्षा’च्या जागांमध्ये पाच-सहा जागांची वाढ करीत युतीचा निर्णय घेतल्याचे कळते.
विधानसभा निवडणूक स्वबळावर लढल्यास भाजपला किमान १६० जागा मिळतील असा जनमत चाचण्यांचा अंदाज आहे. तरीही शिवसेनेसोबतची युती तोडता कामा नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने भूमिका घेतल्याचे कळते. युतीच करायची असेल तर शिवसेनेला १२० जागाच दिल्या जाव्यात अशी भूमिका दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी घेतली होती. त्यामुळे युतीच्या जागावाटपातील गुंता अधिकच वाढला होता. मात्र, दिल्लीतील नेत्यांचा विरोध एका बाजूला ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेसोबतची युती कायम ठेवण्याचा आग्रह धरला होता. रविवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागा १२०वरून १२५ ते १२६वर जाणार असल्याचेही कळते. त्यातील जवळपास १२० जागा शिवसेनेने मागणी केलेल्याच असून, हव्या असलेल्या जागा भाजपकडून खेचून आणण्यात शिवसेना नेतृत्वाला यश आल्याचे सांगण्यात येते.
शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप
रविवारी घटस्थापनेच्या दिवशी शिवसेनेने उमेदवारी निश्चित असलेल्या आणि जागांचा वाद नसलेल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केल्याचे कळते. त्यांच्यात मुंबईतील सुनील प्रभू आणि अजय चौधरी, पुण्यातील विजय शिवतारे, सिन्नरमधील राजाभाऊ वाजे, मालेगावचे दादा भुसे, निफाडचे अनिल कदम, देवळालीचे योगेश घोलप, संजय घाटगे (कागल), संग्रामसिंह कुपेकर (चंदगड), राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), चंद्रदीप नरके (करवीर), डॉ. सुजित मिचणेकर (हातकणंगले), सत्यजीत पाटील (शाहूवाडी), प्रकाश आबिटकर (राधानगरी), उल्हास पाटील (शिरोळ) यांचा समावेश आहे. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून संजय शिरसाट, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना पुन्हा संधी देण्यात आल्याचेही कळते.
