कर्नाटकात आमदारांना खरेदी करून तेथील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत भारतीय जनता पक्ष करत आहे, असा थेट आरोप काँग्रेसने भाजपवर केला आहे. कर्नाटकात निर्माण झालेल्या या स्थितीचा विरोध करण्यासाठी काँग्रेसने संसद परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे इतर मोठे नेतेही सहभागी झाले आहेत.
संसद परिसरात धरणं देतं राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच गोवा आणि कर्नाटकातील राजकीय परिस्थितीला भाजप जबाबदार असल्याने त्याचा निषेध करण्यासाठीच आम्ही निदर्शने करत असल्याचं राहुल यांनी सांगितलं.
गोव्यात भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पाडत विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावळेकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या १० आमदारांना पक्षात घेतले. गोव्यात काँग्रेसचे १५ आमदार होते. या घडामोडीनंतर आता काँग्रेसकडे केवळ ५ आमदार उरले आहेत. गोव्यातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद असून विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये विकासकामे होत नसल्यानेच काँग्रेस पक्षात फूट पडल्याचे कावळेकर यांचे म्हणणे आहे.
